महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव; सुरळीत वीजपुरवठ्यासह प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी
सोलापूर | सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत खासदार प्रणिती शिंदे यांनी महावितरण कार्यालयात धडक देत अधीक्षक अभियंत्यांना जाब विचारला. “पाणी आहे तर लाईट नाही, लाईट आहे तर पाणी नाही” अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शेतीपंपांसाठी होणाऱ्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा वापर करून पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. वीजपुरवठा सुरळीत करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी महावितरण प्रशासनाकडे केली.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला. तसेच मागील वर्षी नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकरी वर्गावर आर्थिक संकट अधिक गडद होत असल्याचे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासनांऐवजी ठोस निर्णय आणि प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वीजपुरवठा आणि नुकसानभरपाईसह प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
“नदी भरून वाहतेय, पण शेतं जळतायत”; महावितरणविरोधात खासदार प्रणिती शिंदे आक्रमक, करपलेली पिके अधिकाऱ्यांच्या टेबलावर
जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनियमित वीजपुरवठा आणि भारनियमनामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत खासदार प्रणिती शिंदे यांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांसह आंदोलन करताना त्यांनी करपलेल्या सोयाबीनच्या पिकांचे अवशेष महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवून प्रशासनाला जाब विचारला.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात पुढील दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आणि किमान सलग आठ तास थ्री-फेज/सिंगल-फेज वीज देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले
…तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगावे’
दरम्यान, प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला. राज्याचे ऊर्जा खाते मुख्यमंत्री यांच्याकडे असताना सोलापूरच्या शेतकऱ्यांना लोडशेडिंगचा सामना का करावा लागत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते स्पष्टपणे सांगावे, अशी टीका त्यांनी केली. महावितरणकडून ग्रामीण भागात सुरू असलेले भारनियमन तातडीने थांबवावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.











