भाऊबिजेला साडीचोळी घेऊन जाण्याचे आश्वासन; “आता जेवायला जाण्याची वेळ नाही”, जरांगे पाटील यांची भूमिका
जालना, दि. १० : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या जेवणाच्या निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, सध्या आंदोलन सुरू असल्याने जेवणासाठी जाणे योग्य ठरणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.
अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, अमृता फडणवीस यांनी मायेच्या आणि आपुलकीच्या भावनेतून निमंत्रण दिले आहे. त्याच भावनेतून आपण त्यांना उत्तर दिले असून, त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांकडेही त्याच आपुलकीने पाहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“ताईंनी सांगितलंय तर जेवायला पण जाऊ, पण भाऊबिजेच्या टायमिंगला जाऊ. आता आंदोलन सुरू आहे. भाऊ मैदानात असताना, भाऊ संकटात जात असताना बहिणीने तेवढा बारकाईने विचार करावा,” अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.
भाऊबिजेच्या दिवशी निमंत्रण मिळाल्यास आपण साडीचोळी घेऊन जाण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. सध्या मात्र आंदोलनाच्या मैदानातून जेवणासाठी जाणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चेच्या फेऱ्या झाल्या असल्या तरी अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही. त्यामुळे अमृता फडणवीस यांच्या निमंत्रणाला प्रतिसाद देताना जरांगे यांनी “आता ती वेळ नाही” असे स्पष्ट केले आहे.
अमृता फडणवीसांचे निमंत्रण स्वीकारले; जरांगे म्हणाले, “भाऊबिजेला साडीचोळी घेऊन येतो”









